उसाला पाच हजार रुपये दर द्यावा : रघुनाथदादा पाटील

नेर्लेतील ऊस उत्पादकांच्या बैठकीत कृष्णा कारखान्याकडे मागणी
नेर्ले : वाळवा तालुक्यातील नेर्ले येथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची विविध मागण्यांसाठी बैठक झाली. दर दहा वर्षांनी कृष्णा कारखान्याने उसाला प्रतिटन दुप्पट दर दिला आहे. हा दर अहवालानुसार २०१० दिला असून २०१० ते २०२० पर्यंत केवळ ५०० रुपयांची वाढ केली असून कारखान्याने शेतकऱ्यांना प्रतिटन उसाला ५ हजार रुपये दर मिळाला पाहिजे, असा ठराव या बैठकीत करण्यात आला आहे. यावेळी शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथदादा पाटील अध्यक्षस्थानी होते. हणमंतराव निकम यांची प्रमुख उपस्थित होती.
कृष्णा कारखान्याच्या पाणी योजनेच्या पाणीपट्टीचा दर २०२३ पासून एकरी ५ टन ऊस कपात केली आहे. ही ऊस कपात उत्पादक सभासदांवर अन्यायकारक आहे. ५० वर्षांपूर्वीची सुरू झालेल्या योजना कालबाह्य झाल्या आहेत. त्यामुळे पाणीपट्टीचा दर एकरी २ हजार पैशाच्या स्वरूपात करावा. मृत सभासदांच्या वारसांची नोंद विना अट विना तक्रार कारखाना प्रशासनाने करावी. तसेच आतापर्यंत थकीत राहिलेली मोफत साखर सभासदांना द्यावी.
कारखाना प्रशासनाने लवकरात लवकर या मागण्यांची दखल घेऊन सभासदांना न्याय द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा दिला सभेत दिला आहे. ऊस उत्पादक हणमंतराव निकम यांनी प्रास्ताविक केले.
वाळवा तालुका अध्यक्ष लक्ष्मण पाटील, युवा आघाडी अध्यक्ष केतन जाधव, सरचिटणीस धनपाल माळी, जगन्नाथ माळी, विकास माने, बबनराव कदम, हणमंतराव कुंभार, किसनराव पाटील यांच्यासह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.