‘साखरसम्राट’ सावंतांच्या सुपुत्राचे ‘अपहरण प्रकरण’ गाजतंय…

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : भैरवनाथ शुगर वर्क्स लि. च्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या सहा साखर कारखान्यांचे प्रमुख, शिक्षण संस्थांचे जाळे विणणारे ‘शिक्षणसम्राट’ आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री डॉ. तानाजी सावंत आपल्या खास स्वभावासाठी सुपरिचित आहेत. त्याची पुन्हा झलक पाहायला मिळाली त्यांचे पुत्र ऋषिराज यांच्या कथित अपहरण नाट्यामध्ये, ते खास विमानाने निघाले बँकॉकला, पण पोहोचले चेन्नईला… या नाट्याचे किस्से सध्या गाजत आहेत आणि सावंत यांच्या खाक्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे…

68 लाखांचं बँकॉक ट्रीप आणि ‘सिस्टम’ वेठीस
शिवसेना नेते डॉ. तानाजी सावंत यांच्या कुटुंबात झालेला एक साधा वाद तणाव, बेपत्ता झालेला मुलगा, पोलिस यंत्रणेला सक्रिय करणे, चार्टर फ्लाईट, आणि थेट केंद्रीय मंत्र्यांपर्यंत गेलेली केस – असा भन्नाट प्रवास करत अखेर चेन्नईत विमान उतरवलं गेलं!

संपूर्ण घटनेचा विचार करता हे एखाद्या हॉलिवूड थ्रिलर चित्रपटाच्या पटकथेप्रमाणे वाटतं. पण दुर्दैवाने, ही गोष्ट खरी आहे आणि यातून अनेक धक्कादायक गोष्टी समोर येतात.

मुलाला थांबवण्यासाठी यंत्रणेचा गैरवापर
अन्य कुणाचा मुलगा घरातून बाहेर गेला तर घरातील मोठे त्याला समजावतात, वाट पाहतात, फोन करतात. पण सावंतसाहेबांनी थेट पोलिसांना गुन्हा दाखल करण्यास भाग पाडलं, विमानतळ यंत्रणेला तणावात टाकलं, आणि शेवटी केंद्रीय हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या सहाय्याने विमानच परत फिरवलं!
हा केवळ वडिलांचा मुलावर असलेला लळा होता की स्वतःच्या ताकदीचा अहंकार दाखवण्याचा प्रकार? सामान्य नागरिकांचा विचार करा—एखादा सर्वसामान्य माणूस पोलिस स्टेशनला गेला आणि म्हणाला, “माझा मुलगा घर सोडून गेला आहे, विमानात बसलाय, प्लीज त्याचं विमान थांबवा!”
तर पोलिस त्याला काय उत्तर देतील?
“भाऊ, घरी जाऊन वाट पाहा, मुलगा स्वतःहून गेला असेल तर आम्ही काही करू शकत नाही!”

पण सावंतांसाठी हा नियम लागू नाही. ते मोठे राजकीय नेते आहेत, त्यांचा दबदबा आहे, त्यामुळे संपूर्ण सिस्टम त्यांच्या इशाऱ्यावर नाचली!

राजकीय वजन आणि पोलिसांचा बिचारा ‘नाईलाज’
एका कौटुंबिक वादासाठी पोलिसांवर दबाव टाकला जातो, गुन्हा दाखल केला जातो, आणि विमान थांबवण्यास भाग पाडलं जातं, यावरून प्रशासन कोणासाठी आणि कसं काम करतं, हे स्पष्ट होतं.
पोलिसांसाठी हा विषय “बेपत्ता व्यक्तीचा शोध” नव्हता. त्यांच्यासमोर माजी मंत्री स्वतः पोलिस स्टेशनमध्ये उभे होते, त्यामुळे कोणतीही पर्याय नव्हती.

राजकीय दबाव म्हणजे काय, याचं हे उत्तम उदाहरण आहे. सर्वसामान्य नागरिक तक्रार घेऊन गेला असता, तर त्याला कोण विचारलं असतं?

चार्टर फ्लाईट आणि सत्तेचा ‘चार्टर’ वापर!
ऋषिराज सावंत बँकॉकला चार्टर फ्लाईटने 68 लाख रुपये खर्चून निघाला होता. आता प्रश्न असा आहे— हे पैसे कुठून आले?
सामान्य माणसाला परदेशात जायचं झालं, तरी व्हिसा, तिकीट, बजेट याचा विचार करावा लागतो. पण सावंत यांच्या मुलाला फक्त चटकन निर्णय घ्यायचा आणि फ्लाइट बुक करायची!
काही लोक सत्तेत असताना त्याचा चार्टर फ्लाईटसारखा गैरवापर करतात, हे उघड झालं.

मोठ्या माणसांचे हट्ट, यंत्रणेचा वापर, आणि सामान्यांचे दुर्लक्षित हक्क : ही घटना फक्त एका नेत्याच्या मुलाच्या बंडखोरीची नाही, तर संपूर्ण यंत्रणा एका सत्ताधाऱ्याच्या हट्टासाठी कशी झुकते, याचा वंगळ नमुना आहे.

एका व्यक्तीसाठी पोलिस तातडीने गुन्हा दाखल करतात. विमानतळ सुरक्षा अधिकारी तत्काळ हालचाली करतात. केंद्रीय मंत्री थेट हस्तक्षेप करतात आणि विमानच वळवले जाते! या सर्व प्रक्रियेमध्ये किती सरकारी यंत्रणा गुंतल्या गेल्या? पोलिस यंत्रणा, विमानतळ प्रशासन, केंद्रीय हवाई उड्डाण मंत्रालय
आता कल्पना करा, एखादा गोरगरीब मुलगा हरवला असता, तर त्याच्या वडिलांची पोलिस स्टेशनमध्ये किती दखल घेतली असती?

सत्ताधाऱ्यांच्या विशेष सुविधांवर प्रश्नचिन्ह
हा प्रकार काही पहिल्यांदाच घडलेला नाही. यापूर्वीही राजकीय लोकांनी आपल्या ताकदीचा गैरवापर करून सर्वसामान्य लोकांसाठी असलेल्या यंत्रणांचा गैरफायदा घेतला आहे.

मुळात कोणत्याही नागरिकाला स्वतःच्या इच्छेने देशाबाहेर जाण्याचा हक्क आहे, मग तो नेत्याचा मुलगा असो की सामान्य माणूस.
ऋषी हा प्रौढ आहे, त्याच्या वडिलांना न सांगता गेला म्हणून संपूर्ण देशात गोंधळ निर्माण करण्याचं काही कारण नव्हतं.

सावंत यांच्या या कृतीवरून एक गोष्ट स्पष्ट आहे – सत्ताधारी नेत्यांना प्रशासन आणि सरकारी यंत्रणा फक्त आपल्या सोयीसाठी कशी वापरता येईल, याची पूर्ण कल्पना असते.
सामान्य माणसाला न्याय मिळवण्यासाठी वषार्नुवर्षे झगडावं लागतं, पण काही लोकांसाठी संपूर्ण व्यवस्था एका फोनवर कामाला लागते.

याला जबाबदार कोण?
तानाजी सावंत – एका कौटुंबिक मुद्द्यासाठी संपूर्ण सरकारी व्यवस्था हलवली.
पोलिस – राजकीय दबावामुळे संपूर्ण प्रकरण गंभीर बनवले.
विमान प्रशासन – एका सामान्य नागरिकाला असे सवलती मिळतील का?
सिस्टम – नेत्यांसाठी वेगळे नियम, सामान्यांसाठी वेगळे!
शेवटचा प्रश्न – सामान्य जनतेसाठी ही ‘प्रसादाची वाट’ उघडी आहे का?
येत्या काळात कोणत्याही सामान्य माणसाच्या मुलाने घर सोडले आणि परदेश गाठला, तर त्याचे पालक पोलिसांकडे गेले तर त्यांची तक्रार घ्यायला कोणताही पोलीस तयार असेल का? की फक्त नेत्यांच्या हट्टासाठीच ही सगळी सरकारी व्यवस्था झुकते?

शिक्षण, बांधकाम, राजकारण इ. विविध क्षेत्रात मोठी कामगिरी करणारे सावंत हे सध्या सहा साखर कारखान्यांचा कारभार सांभाळतात. त्यांच्या सूचनेशिवाय या कारखान्यांची काडीदेखील हालत नाही. सगळीकडे नावाला माणसे नेमली आहेत. अंतिम पॉवर डॉ. सावंत यांच्याकडेच. असं सांगितलं जातं की कोणाला परस्पर १०० रूपये खर्च करण्याचाही अधिकार नाही. सारी सत्ता त्यांच्याकडेच.


‘महाराष्ट्राला भिकेला लावण्याची क्षमता आपल्याकडे आहे….’ असे भयंकर विधानही त्यांनी केले होते.
पण डॉ. सावंत पूर्वी असे नव्हते. आज त्यांचा मुलगा एकट्यासाठी विमान भाड्याने घेऊन विदेशात जातोय, डॉ. सावंत पूर्वी इकॉनॉमी क्लासने फिरायचे. अत्यंत साधेपणाने राहायचे. म्हणूनच जेएसपीएम सारखी संस्था उभी राहिली. पुढे त्यांचा राजकारणात शिरकाव झाला आणि राजकीय व्हायरस त्यांच्या अंगात एवढा भिनला की ते ‘महाराष्ट्राला भिकेला’ लावण्याची भाषा करू लागले. त्याच्या विचित्र वागण्यामुळे त्यांना यावेळी मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही. मात्र त्यांच्या स्वभावात काही बदल होताना दिसत नाही.

(धाराशिव लाइव्ह वरून साभार)

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »