लातूर जिल्ह्यातील पाच हजार हेक्टरवरील ऊस तरारला!

अवकाळी पावसाचा परिणाम
लातूर : गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडत आहे. या पावसामुळे अहमदपूर तालुक्यातील सुमारे ५ हजार हेक्टर ऊस पिकाला जीवदान मिळाल्याचे चित्र आहे, त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे. तालुक्यात यावर्षी उसाचे क्षेत्र वाढल्याचे आकडेवारीवरून आढळते. उन्हाळा आणि वाढत्या पाणी टंचाईमुळे अनेक ठिकाणी ऊस सुकत चालला होता. सध्या पडत असलेल्या पावसामुळे उसाला मात्र जीवनदान मिळाले आहे. मात्र, या पावसामुळे शेतकऱ्यांच्या फळबागांचे आतोनात नुकसान झाले आहे. उसाला फायदा झाला, तर फळबागांना मात्र फटका बसला आहे, त्यामुळे काही शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
उन्हाळ्याचे दिवस असल्याने जिल्ह्यातील पाणी पातळीत घट झाली आहे. पुरेशे पाणी नसल्याने अनेक हेक्टरवरील ऊस पीक सुकत चालला होता. मात्र, या पावसामुळे उसाला चांगलाच ओलावा मिळाल्याने आता पावसाळा येईपर्यंत फारशी अडचण भासणार नसल्याचे चित्र आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील अनेक भागात या अवकाळी पाऊस व गारपीटीने उसाचे पीक वगळता रबी हंगामातील गहू, ज्वारी, हरभरा, करडईसह आंबा, द्राक्षे, पपई, टरबूज, खरबूज यांसह भाजीपाल्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, पालकमंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बेठक घेऊन याबाबत नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत.