देशात पुरेसा साठा असल्याचा उद्योगाचा दावा

नवी दिल्ली | प्रतिनिधी
देशात साखरेचा पुरेसा साठा उपलब्ध असून घाऊक व किरकोळ व्यापाऱ्यांनी कृत्रिम तुटवडा निर्माण करणारी किंवा घाबरून मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्याची गरज नसल्याचे इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (ISMA) आणि नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज (NFCSF) यांनी स्पष्ट केले आहे.

दोन्ही संस्थांनी संयुक्त निवेदनाद्वारे देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी आवश्यक तेवढी साखर उपलब्ध असल्याचे सांगितले. साखरेच्या उपलब्धतेबाबत अफवा पसरविणे किंवा कृत्रिम अनिश्चितता निर्माण करणे हे ग्राहक, शेतकरी आणि उद्योग या तिन्ही घटकांच्या हिताविरोधात असल्याचेही नमूद करण्यात आले.
अलीकडील काळात किरकोळ बाजारातील साखरेच्या दरात वाढ झाली असली, तरी पुरवठा सुरळीत राहावा यासाठी केंद्र सरकारने विविध उपाययोजना केल्या आहेत. यंदाच्या हंगामात साखर निर्यातीवर निर्बंध घालून देशांतर्गत उपलब्धतेला प्राधान्य देण्यात आले असून पुढील हंगामातील उत्पादनाबाबतही उद्योगाने सकारात्मक चित्र व्यक्त केले आहे.






