भरारी पथके करणार वजनकाट्यांची तपासणी

साखर आयुक्तांचे आदेश
पुणे : सर्व साखर कारखान्यांच्या वजनकाट्यांची भरारी पथकांमार्फत आकस्मिक तपासणी करण्याच्या सूचना साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. शेतकरी संघटनांनी वजनकाट्यांच्या प्रमाणीकरणाचा मुद्दा ऐरणीवर आणला असतानाच, भरारी पथके सज्ज झाली आहेत.
या भरारी पथकांमध्ये महसूल, पोलिस, वैधमापनशास्त्र विभाग, प्रादेशिक साखर सह संचालक व शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींची नियुक्ती करावी, असे साखर आयुक्त गायकवाड यांनी काढलेल्या आदेशात स्पष्ट केले आहे.
या पथकातील सदस्यांची नावे व संपर्क क्रमांक कार्यक्षेत्रातील साखर कारखाने व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवीत. त्यासाठी त्यांना योग्य प्रसिद्धी द्यावी. जिल्ह्यातील भरारी पथकांनी स्वयंस्फूर्तीने कारखाना स्थळावर अचानक भेट देऊन वजनकाट्यांची तपासणी करावी. तसेच एखाद्या कारखान्याविरुद्ध तक्रार प्राप्त झाल्यास, त्वरित संबंधित कारखानास्थळी जाऊन वजनकाट्यांची तपासणी करावी आणि गैरप्रकार आढळल्यास यंत्रणेमार्फत कायदेशीर कारवाई करावी, असे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत.