ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी शासकीय वसतिगृहाचे उद्घाटन

बीड : राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते शुक्रवारी बीड येथे ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी उभारण्यात आलेल्या ‘संत भगवानबाबा शासकीय वसतिगृहाचे’ उद्घाटन करण्यात आले.
ऊसतोड कामगारांच्या कुटुंबांना रोजगारासाठी दरवर्षी स्थलांतर करावे लागते. त्यामुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणात खंड पडण्याची शक्यता असते. ही समस्या लक्षात घेऊन उभारण्यात आलेले हे वसतिगृह विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
या वेळी सुनेत्रा पवार म्हणाल्या की, ऊसतोड कामगारांच्या मुलांना पालकांच्या स्थलांतरामुळे शिक्षण अर्धवट सोडावे लागू नये, यासाठी वसतिगृहाची सुविधा उपयुक्त ठरेल. या माध्यमातून विद्यार्थ्यांना सुरक्षित निवास, शिक्षणासाठी पोषक वातावरण आणि उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे.
ऊसतोड कामगार हे राज्याच्या अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचा घटक आहेत. त्यांच्या कष्टामुळे साखर उद्योग सुरळीतपणे सुरू राहण्यास मोठी मदत होते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबांच्या सामाजिक व शैक्षणिक प्रगतीसाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळणे आवश्यक असल्याचेही पवार यांनी नमूद केले.






